"कामाच्या गोष्टी" हा एक मराठी ब्लॉग आहे जिथे दररोज उपयुक्त, माहितीपूर्ण आणि विचारप्रवृत्त लेख प्रसिद्ध केले जातात. जीवन, तंत्रज्ञान, समाज व करिअर यासारख्या विविध विषयांवर आधारित गोष्टी येथे वाचायला मिळतील.
“शिवबा… अफजलखानाचा बंदोबस्त करण्यासाठी आपण खुशाल प्रतापगडावर जावा. आपल्या पश्चात या स्वराज्याची आम्ही जोपासना करू!” जिजाऊ माँ साहेबांनी दिलेला हा खंबीर विश्वासच शिवरायांच्या विजयाची पायाभरणी ठरली. त्या क्षणी माउली शिवरायांच्या पाठिशी खंबीरपणे होत्या… पाठीवर आशीर्वादाचा हात नव्हे तर साऱ्या स्वराज्याचा आत्मा होता!”
आज महाराष्ट्राच्या मातीत एक नव्या लढ्याची, नव्या झुंजीची साक्ष घडते आहे. जनतेच्या हक्कांसाठी, शेतकऱ्यांच्या अधिकारासाठी, बेरोजगार तरुणांच्या न्यायासाठी बच्चू कडू मैदानात उतरले आहेत. हे आंदोलन केवळ एक राजकीय उपोषण नाही, ही हाक आहे त्या विसरलेल्या आश्वासनांना – जी सरकारने निवडणुकीआधी दिली आणि आता कचऱ्याच्या पेटीत टाकली आहेत.
बच्चू कडू हे नाव म्हणजे सामान्यांचं प्रतिनिधित्व. त्यांचं बोलणं झणझणीत, कृती थेट. आणि आता – त्यांच्या उपोषणात, त्यांच्या संघर्षात – एक नवा अध्याय जोडला गेला आहे. त्यांच्या पत्नी स्वतः या आंदोलनात उतरल्या आहेत. काल त्यांनी राज्य सरकारला थेट आणि ठणकावून खडे बोल सुनावले. एका पत्नीनं नवऱ्याच्या आंदोलनात उभी राहून महाराष्ट्राच्या मना जिंकली आहेत. ही घटना आहे, पण त्यापलीकडेही एक संदेश आहे – की ‘सामान्य माणूस हरलेला नाही!’
येसूबाई राणीसाहेबांनी संभाजीराजांच्या पश्चात “श्री सखी राज्ञी जयते” ही राजमुद्रा वापरून स्वराज्याचं सुकाणू हातात घेतलं. त्या काळात शंभुराजे सिद्धी, मुघल, पोर्तुगीज, डच आणि स्वराज्यद्रोही अशा पाच आघाड्यांवर लढत होते. तरी येसूबाई खंबीर होत्या. आज बच्चू कडू संघर्षाच्या रणांगणात आहेत आणि त्यांच्या पत्नी त्यांच्याच येसूबाई बनून उभ्या आहेत.
राजकारणातील निष्ठा, जनतेशी बांधिलकी, आणि आंदोलनातील एकनिष्ठता – हे दुर्मिळ होत चालले आहे. सरकारला निवडणूकपूर्व आश्वासनं आठवून देणारा नेता म्हणजे बच्चू कडू. पण त्यांच्या आंदोलनाला दुर्लक्ष केलं जातंय. जसे आज मराठा आंदोलक मनोहर जारंगे पाटील यांचं नेतृत्व तोडण्याचा प्रयत्न होतोय, तसेच शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्याबाबतही अडथळे निर्माण होत आहेत. हे सांगतं – की ज्यांच्याकडे लोकांची ताकद आहे, त्यांच्यावरच व्यवस्थेला भीती वाटते.
आज गरज आहे ती एकजुटीची. बच्चू कडू हे एक नाव नसून, एक चळवळ आहे – शेतकरी, बेरोजगार, विद्यार्थी आणि मागास वर्गांचा आवाज बनलेलं नाव. त्यांच्या मागे उभं राहणं म्हणजे, केवळ एका नेत्याच्या पाठिशी नव्हे, तर स्वतःच्या हक्कासाठी उभं राहणं होय.
हे आंदोलन आता फक्त एका माणसाचं राहिलेलं नाही. ही एक चळवळ आहे. त्यांचा अन्नत्याग म्हणजे एका युगाचा पुकारा आहे – “पुरे झाली उपेक्षा, आता आमची पाळी!” त्यांच्या पत्नींचं मैदानात येणं म्हणजे जणू मावळ्यांच्या पाठीशी माउलीचं उभं राहणं.
म्हणूनच, आज आपण सर्वांनी – जाती, धर्म, पक्ष, संघटना, मतभेद विसरून – या लढ्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. कारण ही लढाई आहे आपल्या मुलांच्या भवितव्याची, शेतकऱ्याच्या जगण्याची, शिक्षण, रोजगार, कर्जमाफी, आणि स्वाभिमानासाठीच्या अधिकारांची.
शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, आणि सामान्य माणसाला राजा बनवलं. आज बच्चू कडू यांचं आंदोलन त्या परंपरेतील एक छोटा पण झणझणीत अध्याय आहे. आता आपण ठरवायचं – मूक साक्षीदार व्हायचं की स्वराज्याच्या नव्या पर्वात सहभागी व्हायचं?
कारण…
“ही चळवळ नाही थांबणार, ही मशाल नाही विझणार, कारण यामध्ये आहे शेतकऱ्याच्या जीवाची जळती आग आणि जनतेच्या डोळ्यातली आसवांची धार!”