
काल सातारकर बाबा मंदिर सभागृहात संत शिरोमणी रविदास महाराज जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.
खरं तर जयंती म्हंटलं की
पूजन, फोटो, मिरवणूक, डि जे, फार तर भाषणं आणि औपचारिक कार्यक्रम इतपतच गोष्ट मर्यादित राहते.
पण इथे चर्मकार समाजाच्या स्वतःच्या स्थापित प्रबोधिनीने समाजासाठी नेमकं काय केलं आहे, कसं काम केलं आहे, याचा लेखा-जोखाच मांडला.
हा लेखाजोखा केवळ माहिती देणारा नव्हता, तर माझ्यासह अनेक उपस्थितांना अंतर्मुख करणारा आणि विचार करायला लावणारा होता.
या कार्यक्रमाच्या विचारपीठावर माझ्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
रिसोड नगराध्यक्ष भगवान दादा क्षीरसागर,
मराठा सेवा संघाचे शिवाजी कवर,
नगरपरिषद उपाध्यक्ष विष्णू कदम,
सातारकर महाराज संस्थानचे अध्यक्ष देशमुख बापू,
शिक्षण व आरोग्य सभापती संतोष चऱ्हाटे,
पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले,
शांतता समितीचे अध्यक्ष मंचकराव देशमुख,
व्हॉईस ऑफ मीडिया तालुका अध्यक्ष रुपेश बाजड ई
यांची उपस्थिती होती.
संत रविदास : विचारांची उंची, मानवतेची व्यापकता
संत रविदास महाराजांना “संत शिरोमणी” असे का म्हटले जाते, याचं उत्तर त्यांच्या विचारांतच आहे.
“मन चंगा तो कठोती मे गंगा”
आपल्या अजरामर दोह्यातून त्यांनी
विचारांची उंची,
धैर्याची खोली,
आणि मानवतेची व्यापकता
अतिशय साध्या, पण प्रभावी शब्दांत मांडली.
जयंती जातीपुरती मर्यादित नको
या कार्यक्रमात शिवश्री शिवाजी कवर यांनी अतिशय महत्त्वाचा विचार मांडला.
संत आणि महामानवांना केवळ त्यांच्या जातीपुरते मर्यादित न ठेवता,
सर्व समाजाने एकत्र येऊन, आर्थिक व वैचारिक व्यापकता कशी वाढवता येईल
यावर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
मागण्या नाहीत, पावत्या नाहीत… तरीही पूर्ण उपस्थिती
रिसोड नगराध्यक्ष भगवानदादा क्षीरसागर यांनी बोलताना एक वास्तव मांडलं—
आज अनेक जयंतींमध्ये
पावत्या फिरतात,
डीजे वाजतो,
मागण्या केल्या जातात.
पण ही जयंती पूर्णपणे वेगळी होती.
ना कुठली मागणी,
ना कुठली पावती,
ना डीजे,
ना कोणताही दबाव.
पोलीस अधिकारी, नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती यांचं आयुष्य अत्यंत व्यस्त असतं.
तरीही ही सर्व मान्यवर मंडळी पूर्ण वेळ कार्यक्रमाला बसून होती.
यातूनच या कार्यक्रमाचं वेगळेपण आणि गांभीर्य स्पष्टपणे दिसून येत होतं.
शेवटी- लहान मुलांचं गुणगौरव, कोडकौतुक व भाषणे हे वेगळे पण मला विशेष भावलं!
गजानन खंदारे
संभाजी ब्रिगेड वाशिम

