कालची ती संध्याकाळची वेळ… आकाशात मंद उजेड शिल्लक होता, आम्ही तिघे—शिवाजी कव्हर, दिलीप भिसडे आणि मी—पार्डी तिखेच्या रस्त्याने लग्नासाठी निघालो होतो.
गाडीच्या गतीतही मन कुठेतरी स्थिर होत होतं. तेवढ्यात बाजूच्या शेतात उभ्या असलेल्या एका पिंपळावर नजर स्थिरावली…
तो पिंपळ—पानगळ झालेला, विरळ फांद्यांनी जणू आकाशाला स्पर्श करणारा— काळाच्या ओघात थकलेला वाटत होता. एके-वेळी हिरवागार असलेला तो वृक्ष आज जिर्ण आयुष्याची कहाणी सांगत असावा असेही काही वेळा साठी मला वाटले .
त्या क्षणी, नकळत मन भूतकाळात गेलं …
कधी काळी, अशाच एका पिंपळाखाली बसून मला गौतम बुद्ध यांनी “अष्टांगिक मार्ग” दाखवला होता,
अशी एक जाणीव मनात तरळून गेली.
गाडी थांबवून मी त्या दिशेने निघालोच होतो.
पण हात धरून माझ्या एका मित्राने मला थांबवलं.
“ते बघ..! तिकडे बोट दाखवायचं नसतं अन्यथा मोहोळ पाठीशी लागेल.”
“छे, काहीतरीच मोहोळ नाही मी बुद्धाला शोधतोय,” मी शांतपणे म्हणालो ,
“आता तो त्या झाडाखाली नाही… आपल्या आयुष्यातून आपणच हरवला आहे.”
मित्र म्हणाला
मी पुन्हा पिंपळाकडे पाहिलं.
त्या विरळ फांद्यांवर आता मधमाशांची पोळी लटकत होती—काळ्या ठिपक्यांसारखी, पण आतून जिवंत, सतत हलणारी.
त्या पोळ्यांनी जणू त्या वृक्षाभोवती एक अदृश्य सीमारेषाच आखली होती—जवळ जाण्याची हिंमत न होणारी…
क्षणभर सगळं काही स्तब्ध झालं.
वृक्ष, पोळी, वारा… आणि मनात उठणारे विचार.
आपणच का आपल्या आयुष्याभोवती अशा भीतीच्या, अंधश्रद्धेच्या, आणि गोंधळाच्या पोळ्या तयार करून ठेवल्या आहेत?

जिथे एकेकाळी शांतता, ज्ञान आणि विचारांचा वास होता, तिथे आज अस्वस्थतेचा गुंजारव का आहे?
आणि मग एक हळुवार जाणीव उमलली—
माझा “बुद्ध” त्या पिंपळावर शोधण्यात अर्थ नाही…
तो पुन्हा सापडणार असेल, तर तो आपल्या आतच आहे.
त्या कोरड्या फांद्यांवर नवी पालवी फुटावी, तसं…
आपल्या विचारांत, आपल्या कृतीत, आपल्या जगण्यात—
“पुन्हा एकदा बुद्धत्व पेरण्याची गरज आहे.”
अत:दिपभव म्हणून मी पहिल्यांदा माझ्यातला बुद्ध शोधणार
नमो बुद्धाय 🙏
गजानन खंदारे

- “ट्रॅक्टर एन्ट्री, प्री-वेडिंग शूट आणि शेतकरी समाजाचं वास्तव”
आजच्या लग्नसोहळ्यांनी पारंपरिक रितीरिवाजांपलीकडे जाऊन एक वेगळाच ट्रेंड पकडला आहे.प्री-वेडिंग शूट, सेलिब्रिटी-स्टाइल एन्ट्री, व्हायरल व्हिडिओ यामुळे विवाहसोहळा म्हणजे एक “शो” बनला आहे.ग्रामीण भागातही ट्रॅक्टर, घोडागाडी किंवा अनोख्या स्टंटसह केलेली नवरा-नवरीची एन्ट्री ही प्रतिष्ठेची बाब मानली जाऊ लागली आहे.पण या दिखाऊपणामागे खऱ्या समाजाचं, शेतकऱ्यांच्या अडचणींचं, मध्यमवर्गीय कुटुंबांच्या संघर्षाचं वास्तव लपून जातं का?हा लेख त्या विरोधाभासावर प्रकाश…
